वाशिम (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरातील एका आदिवासी निवासी शाळेमधील २२९ विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर ४ कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला आहे.
रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या आदिवासी शाळेत एकूण ३२७ विद्यार्थी संख्या आहे. ५ वी ते ९ वीचे हे सर्व विद्यार्थी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळमधील ५५, बुलडाणा जिल्ह्यातील ०३, हिंगोली जिल्ह्यातील ०८ आणि वाशिम जिल्ह्यातील ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी १४ फेब्रुवारी रोजी शाळेत दाखल झाले होते. सर्व विद्यार्थ्यांची RTPCR टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे रिपोर्ट आले असता २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी २४ तास आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
‘कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके आळीपाळीने २४ तास निवासी शाळेमध्ये तैनात ठेवण्यात आले आहे. या पथकाने ठराविक अंतराने सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी तसंच त्यांना इतर काही लक्षणे असल्यास त्याची तपासणी करून त्यानुसार तातडीने उपचार करावेत. शाळा व्यवस्थापनाने सुद्धा कर्मचाऱ्यांचे एक पथक २४ तास तैनात ठेवावे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर व योग्य आहार मिळेल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी’ अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिली आहे.
दरम्यान शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी निगेटिव्ह आहेत, त्यांची संपूर्ण व्यवस्था स्वतंत्र ठेवावी. तसेच बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी तातडीने करून घ्यावी. यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे, अशी माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.
















