नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत सात हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत २८ हजार २०४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३७३ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २८,२०४ नवीन कोरोना रुग्ण आढळले आणि ३७३ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ४१,५११ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी १९ लाख ९८ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख २७ हजार ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ११ लाख ८० हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपेक्षा कमी झाली आहे. सध्या देशात एकूण ३ लाख ८८ हजार ५०८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात दिवसभरात ४ हजार ५०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ६८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ७५६८ कोरोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८ हजार ३७५ इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात अहमदनगर येथे ५७५, पुणे ३९८, पुणे मनपा १३९, पिंपरी चिंचवड ११८, सोलापूर ४०१, सातारा ५६५, कोल्हापूर ३३५, सांगली ४७८, सांगली-मिरज-कूपवाड १११, रत्नागिरी ११३, बीड येथे १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली.