वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाचा कहर सुरू असून दुसऱ्या लाटेने देशातील नागरिकांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा नवा रेकॉर्ड करताना दिसतोय. अशातच आता देशात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने सावधगिरीचा इशारा अमेरिकनं नागरिकांना दिला आहे. भारतात कोरोना उद्रेक झाल्यामुळे नागरिकांनी भारताचा दौरा करणं टाळावं, असं संस्थेनं म्हटलं आहे. पूर्णपणे लसीकरण झालेलं असलं तरीही संसर्ग होण्याचा व विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात जाणं टाळावं. जर जाणं अत्यावश्यक असेल, तर आधी पूर्णपणे लसीकरण करून घ्यावं,” असा सल्ला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने अमेरिकन नागरिकांना दिला आहे.
देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. सोमवारी आतापर्यंतची सर्वात उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली. देशात २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर १,६१९ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात ५८ हजार ९२४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील परिस्थिती ढासळली असून, केजरीवाल सरकारने तातडीने एका आठवड्याचा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील काही शहरांत लॉकडाउन लागू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर गुजरातमध्येही परिस्थिती बिकट आहे. चिंतेची बाब म्हणजे निवडणूका सुरु असलेल्या राज्यात आता कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.