नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोना वॅक्सीनची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारकडून आजपासून देशातील प्रत्येक राज्यात कोरोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशभरात हा ‘ड्राय रन’ होत आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे.
ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता. लसीकरण कार्यक्रम राबवतांना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे. तसेच लसीकरण मोहिमेदरम्यान केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीसाठी फिडबॅक मिळवून त्यात योग्य ते बदल करण्यासाठी हा रन असणार आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येतील प्रत्येक माणसापर्यंत लस पोहोचवायची असेल तर मायक्रो प्लानिंग महत्वाचे आहे, त्यासाठी हा ड्राय रन महत्वाचा आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ड्राय रन’साठी संपूर्ण तयारी झालेली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली गेली आहे. कोरोनाच्या लसीकरणाचा ड्राय रन आज होणार आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यात समावेश असून पुण्यातील तीन केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. औंध जिल्हा रुग्णालय, मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे.
ड्राय रन सर्व राज्यांतील राजधानीमध्ये तीन सत्रामध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. काही राज्यांत अशा जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुर्गम भागात आहेत. ड्राय रन ही प्रत्यक्षात लसीकरण करताना ज्याप्रमाणे नियोजन असते. तशाच प्रकारे होणार आहे. मात्र, या ड्राय रनमध्ये लस दिली जाणार नाही, फक्त लोकांचा डेटा घेतला जाईल, त्याला Co Win अॅपवर अपलोड केला जाईल. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेन्ट आणि ऑनलाइन डेटा सुरक्षित करणे यासारख्या बर्याच गोष्टींची चाचणी केली जाईल. याव्यतिरिक्त, लसीकरण AEFI म्हणजेच लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांनंतर होणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रतिकूल घटनांच्या व्यवस्थापनावर ड्राय रनचा महत्त्वपूर्ण फोकस असेल.
याआधी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वीरित्या झाली आहे. २८ आणि २९ डिसेंबरला या चार राज्यात ड्राय रन घेण्यात आला होता.