चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच मोठ्या जल्लोषात आगमन झाले होते. या स्वागत रॅलीत आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह पाच हजार नागरिकांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्वागतानिमित्त बिलाखेड ते शहरातील सिग्नल चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. यावरुन पोलीस नाईक भटू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह चार ते पाच हजार नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा. पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड करीत आहेत.
राजकारण होता कामा नये – खा. उन्मेष पाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेली आस्था, प्रेमामुळे मिरवणुकीत जनसागर उसळला होता. यात राजकारण होता कामा नये, असे खासदार उन्मेष पाटील म्हणाले.
महाराजांवर असलेल्या श्रद्धेने व प्रेमाने गर्दी झाली – माजी आ. राजीव देशमुख
मिरवणुकीमुळे पोलीसांनी गुन्हा केला आहे. महाराजांवर असलेल्या श्रद्धेने व प्रेमाने गर्दी झाली होती. पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याचा मनापासून आनंद असल्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी सांगितले.