जामनेर (प्रतिनिधी) वादळाने रविवारी जामनेर शहरासह तालुक्यात थैमान घातले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अवघ्या दहा मिनिटांमध्ये तालुक्यात शेकडो झाडे, विजेचे खांब जमीनदोस्त झाले. तर जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातील खोकरमळा जंगलात पाऊस व गारपीटमुळे जवळपास पाचशे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे यात तब्बल ८० ते ९० लाखांचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, जामनेर तालुक्याला रविवारी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे असंख्य वृक्ष, विजेचे खांब कोसळले. या वादळामुळे पत्रे उडून तीन जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. एकाचे पत्राने पोट कापले गेल्याने त्याची परिस्थिती गंभीर आहे.
पत्र्याने तरुणाचे पोट कापले गेले !
जामनेर तालुक्यात सलग सहाव्या दिवशीही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. अवघ्या दहा मिनिटे चाललेल्या या चक्रीवादळामुळे जामनेर तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोनबर्डीवर शेंगदाणे फुटाणे विकण्यासाठी गेलेला मनोज अभिमान माळीसह सोपान झेंडू गायके हे जखमी झाले आहेत. तर बजरंग पुण्यातील शुभम दत्तू काळे या तरुणाचे पत्र्याने पोट कापले गेले असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील प्रथम उपचार नंतर त्यास जळगाव येथे हलविण्यात आले आहे. पहूर येथे वादळासह गारपीट झाली. घरांची पत्रे उडाली, शेंदुर्णी रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अजिंठा पंपाचे शेड वादळाने कोसळले.
पाचशे मेंढ्यांचा मृत्यू !
पिंपळगाव गोलाईत शिवारात भगवान सदाशिव कोळेकर (रा.नांदगाव, जि.नाशिक ) येथील सहा बांधवाचा मेंढरांचा वाडा उतरला होता. यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वाडावरील मेंढ्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर काही गारपीटीच्या माऱ्यामुळे दगावल्या आहेत. जवळपास पाचशे मेंढ्यांचा मृत्यू झालाय. यात सहा धनगर बांधवांचे तब्बल ८० ते ९० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.