मुंबई (वृत्तसंस्था) अंगाडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुलीप्रकरणी पोलीस उपायुक्त सौरव त्रिपाठी यांना मुंबई पोलिसांनी फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे. अंगाडिया व्यावसायिकांना चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेऊन खंडणी वसूल केल्याचा आरोप सौरव त्रिपाठींसह चार पोलिसांवर आहे.
अंगाडिया व्यावसायिकाना धाक दाखवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांची झालेल्या पोलीस चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव बाहेर आले. त्यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मागील काही दिवसांत राज्यांत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही असा आरोप सातत्याने विरोधक करत आहे. त्यातच आता डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना क्राईम इंटेलिजन्स युनिटने फरार घोषित केल्यामुळे सरकारला धारेवर धरण्याची विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे.
काय आहे प्रकरणं?
एलटी मार्ग पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यानी आंगाडिया व्यवसायिकांकडून खंडणी उकळल्याचं समोर आलं होतं. अंगाडिया व्यवसायिकाकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणामध्ये डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा समावेश असल्याचं समोर आलं. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीत त्रिपाठी यांचं नाव समोर आलं. सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगाडिया असोसिएशनकडून महिना १० लाख खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.