बुलढाणा (वृत्तसंस्था) पावसाळ्यात पिकात पावसाचे पाणी शिरून पिकाचे नुकसान होऊ नये, म्हणून जेसीबीच्या साहाय्याने नाली खोदून घेत असतांना जेसीबीखाली दबून पाच बहिणींच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरा देशमुख येथे घडली. अक्षय देशमुख असे मृत तरुणाचे नाव आहे. हृदयद्रावक म्हणजे दीड वर्षापूर्वी वडिलांचे निधन आणि आईला पॅरालिसिस झाल्यानंतर अक्षय संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता. अक्षयच्या अपघाती मृत्यू नंतर पाचही बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश केला.
अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी पलटी !
पिकात पावसाचे पाणी शिरून पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी अक्षय हा आपल्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने नाली खोदून घेत होता. यावेळी अक्षय केबिनमध्ये चालकाच्या शेजारी बसलेला होता. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी पलटी झाली आणि यात अक्षय जेसीबी खाली दबला गेला. अक्षय जीवाच्या आकांताने मला वाचवा म्हणून मदत मागत होता. परंतू कुणीही काही करू शकले नाही. त्यामुळे अर्धा तास जेसीबी खाली दबल्यामुळे अक्षयचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दीड वर्षापूर्वी वडिलांचे निधन…आईलाही पॅरालिसिस !
मंगलाबाई किसनराव देशमुख यांच्या पतीचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. त्यांना पाच मुली आणि मुलगा अक्षय पाचही मुलीचे लग्न झाले. पतीच्या निधनाच्या वेळी मुलगा अक्षय हा अकरावीत होता. त्यामुळे कमी वयात त्या मुलाने घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. काही दिवसांपूर्वी आईलाही पॅरालिसिस झाला आणि पुन्हा घरची जबाबदारी वाढली. आता तो शेतीची कामे चांगल्या पद्धतीने करीत होता. सोबतच शिक्षणही सुरू होते. मुलगा कुटुंबाची जबाबदार सांभाळण्यासह स्वतःच्या पायावर देखील उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आईलाही मोठा धीर मिळाला होता. परंतु अचानक मंगलाबाईचा एकुलता एक काळजाचा तुकडा आणि बहिणींना रक्षा बंधनाला बोलावणारा लाडका भाऊ देखील काळाने हिरावून नेला.
आईसोबत नवीन घरात राहण्याचे स्वप्न भंगले !
अक्षयने काही दिवसापूर्वीच नवीन घर बांधलं. त्यांचा घरकुलसाठीही नंबर लागला होता. त्यात आणखी काही पैसे टाकून अक्षयने नवीन घराचे स्वप्न तर पूर्ण केले. परंतु त्या घरात आईसोबत आनंदाने राहण्याच स्वप्न अधुरच राहिल.
अवघ्या काही क्षणात अख्खं गाव सुन्न !
उमरा देशमुख येथील अक्षय देशमुख याच्याकडे अवघी दोन एकरच शेती आहे. घरची परिस्थिती हलाखीची. दरम्यान, अक्षयने कष्टाच्या जोरावर आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी चांगली सांभाळली. आपल्या चांगल्या स्वभावामुळे त्याने गावातही सर्वांच्या मनात घर केले होते. अक्षयच्या मृत्यूची वार्ता पसरताच काही क्षणांतच अख्खं गाव सुन्न झालं. तर आपल्या एकुलत्या एक भावाला मृतावस्थेत बघितल्यानंतर पाचही बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश दगडाला पाझर फोडणारा होता.