नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या काळात योग्यरीतीने कर्तव्य पार न पाडणार्या दिल्ली पोलिसांना स्थानिक सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी हा दंड ठोठावला आहे.
मागील वर्षी उसळलेल्या दंगलीत मोहम्मद नासिर याला डोळ्यात गोळी लागली होती. एफआयआर दाखल करण्यासाठी तो पोलिसांकडे गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार दुसर्या एफआयआरसोबत जोडली. पोलिस आरोपींचा बचाव करीत आहे, असे पूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर जाणवत आहे. दिल्ली पोलिसांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडलेले नाही, असे सत्र न्यायालयाने निर्णय देताना सांगितले. पोलिसांची भूमिका अतिशय शिथिल असल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा अशा प्रकारचा तपास संवेदनाहीन व हास्यास्पद असल्याचे ताशेरे ओढले.
मोहम्मद नासिर यांनी गेल्या वर्षी १९ मार्चला भजनपुरा पोलिस ठाण्यात नरेश त्यागी, सुभाष त्यागी, उत्तम त्यागी, सुशील, नरेश गौर व अन्य काही जणांविरोधात गोळीबार केल्या प्रकरणात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी ही फिर्याद दाखल केली नाही. पोलिसांच्या अशा वर्तनाने निराश होऊन नासिर यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला व त्यांच्याकडे फिर्याद दाखल करण्याची मागणी केली.
या दरम्यान दिल्ली पोलिसांनी नासिर यांच्या भागात हिंसाचार झाला होता त्या ठिकाणी ६ अन्य जणांना गोळी लागल्याची फिर्याद नोंद केली होती. ही फिर्याद पर्याप्त असल्याने नासिर यांची स्वतःची फिर्याद नोंद करण्याचे कारण उरत नाही, असा युक्तीवाद न्यायालयात केला होता. या गोळीबार घटनेची पूर्ण चौकशी होत असून गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली आहे व त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगितले.
पण न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा हा युक्तीवाद फेटाळत ३ जून २०२०मध्ये नासिर यांनी दाखल केलेली फिर्याद पोलिसांनी नोंद केली नाही असे निदर्शनास आणून दिले. नासिर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले होते. त्या तक्रारीकडे दिल्ली पोलिसांनी दुर्लक्ष केले असा ठपका ठेवला.