जळगाव (प्रतिनिधी) ठेकेदारांच्या बिलांसाठी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड – भोसले यांच्या मार्फत आयुक्तांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले की, दि.२७ ते २९ जुलै दरम्यान जळगाव मनपाच्या इमारतीसमोर नगरसेवकांकडून शहरातील साफसफाईसह मुलभूत सुविधासाठी साखळी उपोषण करण्यात आले. परंतु हे उपोषण मक्तेदारांची बिले काढण्यासाठी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे जर हे आंदोलन मक्तेदारांची बिले काढण्यासाठी असेल तर, त्याची चौकशी करून अशा नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्या मार्फत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देवून केली आहे.