धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे गावात पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. अक्षय संजय महाजन (रा. कळमसरे ता. अमळनेर, ह.मु. हिंगोणे ता. धरणगाव) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले संजय महाजन (माळी) हे कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा मुलगा रविवारी दुपारी २ वाजता पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला. तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले. मात्र, तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. अक्षय माळी हा पाचवीत शिकत होता.
गावाजवळच जमिनीला समतोल असणाऱ्या विहिरीचा अंदाज न आल्याने अक्षय विहिरीत जाऊन पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा संजय माधव महाजन यांचा एकुलता मुलगा होता. तो हिंगोणें बुद्रुक येथील अंजनी विद्यामंदिरात सहावीत शिक्षण घेत होता. त्याला इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनविण्याचा छंद होता. रविवारी दुपारीच त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केला होता. तो त्याचा शेवटचा व्हिडीओ ठरला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे.