धरणगाव (प्रतिनिधी)अमळनेरजवळ मालगाडी घसरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर धरणगाव स्थानकावर अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी धरणगाव शहरातील अनेक संघटना आणि कार्यकर्ते देवदूत ठरले.
धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबलेल्या सिकंदराबाद-हिसार एक्सप्रेस आणि उधना-जयनगर एक्सप्रेस या रेल्वेतील प्रवासी पाणी आणि अन्नासाठी व्याकुळ झाले होते. वृद्ध बालक आणि महिलांचे मोठे हाल होत होते. ही गोष्ट समजतात धरणगावातील विविध राजकीय सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यांनी प्रवाशांना खिचडी, पाणी, फळे, बिस्किटे पाकीट वाटप केले. तर धरणगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे अनेक आजारी प्रवाशांची मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात आले. विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी माणुसकीसाठी रात्रभर प्रवाशांना सेवा दिली. रात्रभर चाललेल्या या सेवाकार्यात जवळपास 100 हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले. विविध राज्यांतून प्रवास करणाऱ्या तेलंगणा ते बिहार येथील प्रवाशांनीही या सेवाभावाला सलाम करत आभार व्यक्त केले. धरणगावच्या या एकतेचा आणि माणुसकीच्या जिवंत उदाहरणाचा सर्वत्र कौतुक होत आहे.