लखनऊ (वृत्तसंस्था) भावजयी आपल्या शेतात शौचास गेली म्हणून रागात एका दीराने आपल्या भावाला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत आरोपीच्या भावाचा मृत्यू झाला. ही घटना पूरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील कसगंजा गावात घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृतक व्यक्तीचा मुलगा मुनीश याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मृतकाचा मुलगा मुनीश याने तक्रारीत म्हटल आहे की, आमच्या घरात शौचालय नसल्याने माझी ५५ वर्षीय आई निर्मला देवी शनिवारी (२८ ऑगस्ट) तलावाजवळ शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी तिथे गावातील काही नागरीक होते. त्यामुळे आई तलावाच्या शेजारी माझे काका बाबूराम (वय ६०) यांचं शेत आहे. तिथे आई शौचास गेली. याच गोष्टीवरुन रागावलेल्या काका आणि त्यांच्या मुलांनी मिळून माझ्या वडिलांना मारहाण करत त्यांचा जीव घेतला”.
“विशेष म्हणजे काका बाबूराम आणि त्यांच्या मुलांनी त्याचदिवशी संध्याकाळी माझ्या आईला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची देखील धमकी दिली. काका आणि त्यांच्या मुलांचं तरीदेखील पोट भरलं नव्हतं. ते दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या आईला पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर माझ्या वडिलांनी विषयाला पूर्णविराम देण्यास सांगितलं. पण काका आणि त्यांच्या मुलांनी माझ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या ७० वर्षीय वडिलांना इतकी मारहाण केली की ते प्रचंड जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला”, असे आरोप मुनीशने केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी पक्षाचे माणसंही जखमी आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.