जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमध्ये पावसाळ्यात रस्त्याची कामे होऊ शकतात मग शहरात का नाही?. असा प्रश्न उपस्थित करत मक्तेदाराने वेळेवर काम न केल्यास काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
अजिंठा विश्रामगृह येथे मंगळवारी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, शहर अभियंता एम.जी. गिरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित होते. रस्त्यांची २५० कामे मंजूर अाहेत. त्यापैकी १२४ कामे पूर्ण झाली असून अजूनही निम्मे कामे पूर्ण झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. ३८ कोटींच्या निधीपैकी १२ कोटींच्या निधीतून प्रमुख १० रस्त्यांच्या कामांना सुरुवात का झाली नाही असा सवाल केला. काम वेळेवर व्हावे यासाठी मक्तेदाराकडून स्टॅम्प भरून घेण्यात यावा. मक्तेदाराने जर वेळेवर काम नाही केले तर मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्याही सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना पावसाचे कारण मक्तेदाराकडून दिले जात आहे; मात्र दुसरीकडे अन्य भागातील व विशेष करून जळगाव व धरणगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे पावसाळ्यात देखील होत असताना जळगाव शहरातील रस्त्यांच्याच कामांना पावसाळ्याचा अडसर का ठरते आहे? अशा शब्दात जळगावातील रखडलेल्या कामांवर मंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा व मक्तेदाराला धारेवर धरले.