मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या दोन दिवसांत चर्चा होणार असल्याचे ट्विट शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
दिपाली सय्यद यांनी 16 जुलैला रात्री 11 च्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरता भजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.
दिपाली सय्यद यांच्या ट्विटनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे पुन्हा एकत्र येणार का?, या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचे शिंदे गटाकडून सातत्याने टाळण्यात येत होते. त्यामुळे आता दिपाली सय्यद यांच्या ट्विटनंतर खरंच अशी काही भेट किंवा चर्चा या दोन नेत्यांमध्ये होणार का?, याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. दिपाली सय्यद यांनी हे ट्विट उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी या मध्यस्थीसाठी प्रय़त्न केले का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.