मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही पुढे आली आहे. या दोन्ही मुद्द्यांना उत्तर देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही आरोप केले तरी सरकराच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातील वाढत्या हस्तक्षेपावर टीका केली. केंद्रीय तपासयंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
परमबीर सिंग यांनी पत्र दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. पण, देशमुख मंत्रिपदावर असताना निष्पक्ष चौकशी होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, ”जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे आणि दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो ते घेतील. विरोधकांच्या बेछुट आणि बेफाम आरोपांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलंय की विरोधाचं राजकारण करायचं आणि केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचं. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार करायचा. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली असून, राज्यपालांची भेट घेणार असल्याबद्दल राऊत यांना मत विचारण्यात आलं. त्यावर राऊत म्हणाले, ”प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खोटी-नाटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव आणतंय किंवा एक केस बनतं. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकतं नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे,” असं संजय राऊत म्हणाले.