जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा भागातील गरिबांना तात्काळ रेशन वाटप करा, अशी मागणी करत लोक संघर्ष मोर्चाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव घातला.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील तांबापुरा ह्या भागातील लोक हातावर पोट असणारी असून कोरोनामधील लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अशा वेळी लोक संघर्ष मोर्चाने वेळोवेळी संबंधित दुकानदार नंबर ३८/१ यांनी कायम अंतोदय वाल्यांना ३५ किलो धान्य न देता चार किलो धान्य दिले तर अनेक जणांना रेशनकार्ड वर पाच लोक असताना फक्त सात किलो धान्य दिले. ह्या दुकानदाराच्या असंख्य तक्रारी होत्या ह्यांना आम्ही ट्रकमध्ये अवैधरित्या धान्य भरताना पकडुन दिले होते.
यानंतर त्याचे दुकान निलंबित झाल्याने दुसऱ्या दुकानाशी ह्या कार्ड धारकांना जोडण्यात आले. मात्र यांना जून व जुलैचे धान्य मोफत व विकत दोन्ही प्रकारचे अद्याप मिळालेले नाही. साखर तर ह्या कार्डधारकांनी अद्याप बघितलेली नाही. मोल मजुरीचे हाल असणाऱ्या ह्या गरिबांना दोन महिन्यापासून धान्यशिवाय वंचित ठेवले आहे. ही बाब अत्यंत निषेधार्थ असून लोक संघर्ष मोर्चाने ह्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना घेराव घातला असता त्यांनी दुकानदाराशी प्रत्यक्ष बोलून उद्या कायद्याप्रमाणे देय असलेले धान्य वाटप करण्याचे आदेश दिले. तसेच शहरातील अनियमितता संपूर्ण आढावा घेवुन दूर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी तालुका अधिकारी पुरवठा अधिकारी यांना दिला.
ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, कैलास मोरे, मंगला सोनवणे, संगीता मोरे, देवाकाबाई ठाकरे, कल्पना गायकवाड, सुरेश बोरसे, लताबाई बोरसे, हिरामण मोरे, बाबू सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, तुळशीराम मोरे, शंकर बोरसे, आशा सोनवणे आदी उपस्थित होते.