जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल, त्याचे मन:पुर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा…ते कर्तव्यदक्ष अध्यक्ष म्हणून सिद्ध व्हावेत ही अपेक्षा.
सध्याच्या राजकीय स्थितीत महाविकास आघाडीचा हा प्रयोग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यशस्वी होणे, हेच एक मोठे आश्चर्य म्हणता येईल, काही असो, बँकेची सूत्रे सहकार क्षेत्राचा दीर्घ अनुभव असलेले आणि अभ्यासू व संयमी वृत्तीचे देवकरअप्पा यांच्याकडे गेल्याबद्दल जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
खर तर निवडणुकीतील आघाडीचे बलाबल लक्षात घेता अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी उशीर व्हायलाच नव्हता, ज्यांच्याकडे नेते म्हणून याबाबत जबाबदारी सोपविली होती, ते एक दिवस आधी देखील अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करू शकले असते, पण त्यांनी ऐनवेळी उमेदवार जाहीर केले, त्यातून त्यांना काय साध्य करायचे होते, हे काहींना कळले अन् काहींनी समजून घेतलं. राजकारणात असं चालतच असतं.
राजकरणाच्या खेळात परोपकार हा शब्दच नसतो, गणिती पद्धतीचा हा खेळ बाजी हातात येत नाही, तोपर्यंत काही मुसद्दी खेळतच असतात. यातील वस्तुस्थिती काही असली तरी एकूणच या निवडणुकीत श्री देवकर बाजीगर ठरतात. कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीतूनच त्यांना बाद करण्याचे प्रयत्न झाले होते. जळगाव घरकुल घोटाळ्यातील सामूहिक आरोपाच्या प्रकरणात त्यांच्या शिक्षेला मिळालेली स्थगिती उठवावी, यासाठी संचालक पदाच्या ऐन निवडणुकीच्या वेळी काही मंडळी सुप्रिम कोर्टात गेली, मात्र स्थगिती उठविण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे त्यांचा संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला.
बहुमतांनी निवडून आल्यानंतर त्यांना अध्यक्ष करण्यास कुणाचाही विरोध नसताना, उमेदवारीसाठी प्रतीक्षा करत, थेट उमेदवारी अर्ज भरण्याची मानसिकता व्यक्त करावी लागली, तेव्हा कुठे त्यांना उमेदवार म्हणून जाहीर केले गेले. वास्तविक महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसे परिवारातून कुणी ही उमेदवार नसणार असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. असे असताना त्यांच्याकडून देवकरांची उमेदवारी जाहिर करण्याबाबत झालेला विलंब अनाकलनीय आहे.
सध्या त्यांची राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा नेते म्हणून गणना होते आणि बँकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असताना त्यांनी २ डिसेंम्बरच्या आघाडीच्या बैठकीतच श्री देवकर यांचे नाव जाहीर केले असते, तर विलंबाबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या शंकांना संधीच मिळाली नसती. कारणं काहीही असली तरी आघाडीचे नेते म्हणून श्री खडसे यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जी बाजी मारली, ती राजकीय दृष्टया एक मोठी उपलब्धी देखील आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कामगिरीही कौतुकास्पद म्हणावी लागेल. विशेषतः त्यांना शक्य असतानाही त्यांनी आपल्या कुटुंबातील कुणालाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे केले नाही, त्यांनी या बाबतचीआपली भूमिका खूप आधीच जाहीर केली होती व त्यावर ते ठामही राहिले. याबद्दल त्यांचेही कौतुकच केले पाहिजे.
सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४