जळगाव (प्रतिनिधी) टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय, त्यांच्याकडे सीएसआरचा पैसा असतो. एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून टाटा’ने आपला सीएसआर फंड वापरावा. जनतेच्या खिशातील वाटा कशाला घ्यावा, टाटा’ला जनतेचा पैसा देऊ नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगावातील पद्मालय शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय, त्यांच्याकडे सीएसआरचा पैसा असतो. रिलायन्स, अदानी हे जे प्रकल्प उभे करतात, ते काही आपल्या पैशांनी करत नाहीत. जनतेच्या पैशांच्या आधारावर ते उभे राहतात. आता तर मोदी सरकार आल्यापासून नवीन मोहीम आली आहे. जनतेचा पैसा हे लोक स्वतःच्या इन्स्टिट्यूटसाठी वापरतात. नागपूरला जे आरएसएसचे कॅन्सर हॉस्पिटल उभे राहिले, ते सीएसआर फंडातूनच झाले. अलीकडे त्या पैशांचा दुरुपयोग केला जातोय. एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून टाटा’ने आपला सीएसआर फंड वापरावा. जनतेच्या खिशातील वाटा कशाला घ्यावा, टाटा’ला जनतेचा पैसा देऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचेही पटोले म्हणाले.
टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह मंत्री जितेंद्र आव्हाड हे नाराज झाल्याची चर्चा आहे. याच विषयावर जळगावात पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारले असता, त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली.
















