धरणगाव (प्रतिनिधी) ‘सोशल मीडियावर फिरणारे निनावी मेसेज म्हणजे वाचन नसून रोजचे वृत्तपत्र,ई-बुक्स, ई-मॅगझिन,ई-वृत्तपत्र वाचन हे खरे वाचन असते.ते हातावरच्या एका बोटावर मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून वाचता येते किंवा थेट पुस्तके, वृत्तपत्र वाचूनही भौतिकमाध्यमाने वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत करता येऊ शकते, म्हणून वाचाल तर वाचाल ही उक्ती आपल्या व्यक्तिमत्वात भिनवावी, असा सल्ला उपमुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिला येथील १०६ वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूल मध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनप्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांसाठी एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आॅनलाईन प्रश्नमंजूषा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मी राष्ट्रपती झालो तर -‘ या विषयावर आॅनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली. तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अभिवाचन आयोजित करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये दोनशे विद्यार्थी सहभागी झाले.
प्रारंभी उपमुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी ‘वाचायचे कशासाठी?’ या विषयावर विद्यार्थ्यांशी आॅनलाईन संवाद साधला. स्पर्धा प्रमुख गणेशसिंह सूर्यवंशी यांनी सूत्रसंचलन व अभिवाचनाचे महत्त्व विशद केले. निबंध स्पर्धेचे स्पर्धेचे संयोजन संजय बेलदार यांनी तर प्रश्नमंजुषेचे संयोजन डॉ. वैशाली गालापूरे यांनी केले. मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर यांनी मार्गदर्शन केले.