चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक जितेंद्र वाघ यांना दिनांक ६ जानेवारी रोजी अचानक छातीत दुखायला लागल्यामुळे ते त्यांचे नेहमीचे डॉक्टर सुधन्वा कुलकर्णी यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता डॉक्टर कुलकर्णी यांनी त्यांना डॉक्टर शैलेश राऊळ यांच्याकडे पाठविले.
डॉक्टर शैलेश राऊळ यांनी जितेंद्र वाघ यांची ताबडतोब तपासणी करून त्यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे पाहून ताबडतोब धुळे येथील डॉक्टर दीपक शिंदे यांच्या अंजना हॉस्पिटल मध्ये स्वतः सोबत घेऊन जाऊन तिथे त्यांची प्रथम ऍन्जिओग्राफी केली आणि त्यानंतर एन्जोप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रात्रीचे दीड वाजले डॉक्टर राऊळ यांनी स्वतः वाघ यांच्यासोबत तोपर्यंत थांबून त्यांना सर्व प्रकारची मदत व धीर देण्याचे काम केले. त्यांनी तात्काळ घेतलेला निर्णय आणि स्वतः तत्परतेने केलेली मदत यामुळे आज सह्याद्रीचा एक दुर्गसेवक ठणठणीत बरा झाला असून मोठ्या संकटातून बाहेर आला आहे. यासाठी जितेंद्र वाघ व त्यांच्या भगिनी मिराताई वाघ, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी डॉक्टर शैलेश राऊळ यांचे मनापासून आभार मानले व सहकार्य केलेल्या सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांचे देखील आभार मानले, समाजामध्ये अशा पद्धतीने कर्तव्या बरोबरच सेवाभाव जपणाऱ्या डॉक्टर शैलेश राऊळ यांचे आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत मनापासून आभार मानतो.