कल्याण (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेले शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील १०० कोटीची ७८ एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. घोटाळा केलेली १०० कोटीची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही ईडी जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
यावेळी सोमय्या यांनी सांगितलं की, एनईसीएलच्या १०० कोटींच्या घोटाळ्याच्या रकमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे ७८ एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन ईडीने जप्त करण्याची नोटीस २०१४ सालीच काढली होती. आता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेल्या घोटाळेबाज सरनाईकांच्या विरोधात ठाकरे सरकार काय कारवाई करणार आहे? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. १३ हजार गुतंवणूकदारांचे ५६० कोटी रुपये सरनाईक यांनी गायब केले आहेत. घोटाळ्याषी सरनाईक यांचा थेट संबंध आहे. १०० कोटी रुपये सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी सरनाईकांच्या अन्य मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. यावेळी सोमय्या म्हणाले की, सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. ठाकरे सरकार घाबरले आहे. एका मागोमाग घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची आहे असे सोमय्या यांनी सांगितले.
कल्याण-टिटवाळा येथील गुरवली येथे येण्यासाठी मुंबईहून निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना टिटवाळा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यांची गाडी वाहतूक कोंडीत फसली. अखेर स्वत: सोमय्या गाडीतून उतरले. त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली. ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करत आहे. अशी टीका सोमय्या यांनी केली.
ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करीत आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात राज्याच्या प्रगतीची गती ही थांबली आहे. महापालिका निवडणूका जवळ आलेल्या आहेत. आगामी महापालिका निवडणूकीत जतना ठाकरे सरकारला धडा शिकविणार आहे. असे किरीट सोमय्या यांनी म्हणालेत.
















