मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. अशातच मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच महसूल विभागातच आणखी आठ ते नऊ लोकांना ताप, थंडी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आढळल्याची देखील माहिती समोर येत आहे.
प्रशासकीय आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ माजली असून पुढील काही दिवसात मंत्रालयात पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवेशाला देखील मर्यादा आणण्याचा विचार सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच महसूल विभागात सॅनिटायझेशनही करण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील हे कर्मचारी कोण आहेत, त्यांचा गेल्या दोन दिवसात काही संपर्क आला का? याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे. मात्र मंत्रालयात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केल्याने धाकधूक वाढू लागली आहे.
धार्मिक सामाजिक-राजकीय कार्यक्रम, जत्रा-यात्रा रद्द कराव्यात अशा स्वरूपाचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे मार्च १ पर्यंत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार हे दररोज वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा कार्यक्रमात सहभागी होत असतात. पवार यांच्याबरोबर अनेक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.
राज्यात मागील आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या साधारण दोन हजाराच्या आसपास होती. पण काल एका दिवसात जवळपास सात हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. राज्यामध्ये ठाणे, मुंबई, पुणे, अमरावती या शहरांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अधिक आढळत असून ॲक्टिव रुग्ण देखील या शहरांमध्ये सर्वाधिक आहेत.