छत्तीसगढ (वृत्तसंस्था) छत्तीसगढच्या बीजापूरमध्ये रस्त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या एका इंजिनिअरचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं. यानंतर इंजिनिअरच्या परिवाराला धक्का बसला. इंजिनिअरचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. आता त्याची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन जंगलात नक्षलवाद्यांना भेटायला निघाली आहे.
सब इंजिनिअर अजय रोशन लकडा बीजापूरच्या पीएमजीएसवायमध्ये कार्यरत आहे. तो गुरूवारी दुपारी एक वाजता चपराशी लक्ष्मणसोबत गोरना मनकेली भागातील रस्त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी गेला होता. मात्र दोघेही मुख्यालयात परत आले नाहीत. विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधलं. पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. ग्रामीण लोकांनी विभागीय अधिकाऱ्यांना माहिती दिली की, काही लोक सब इंजिनिअर आणि चपराश्याला जंगलाकडे घेऊन गेले. आणखी माहिती मिळवल्यावर समजलं की नक्षलवाद्यांनी दोघांचं अपहरण केलं. यानंतर इंजिनिअरच्या परिवाराला धक्का बसला. त्याची पत्नी अर्पिताने नक्षलवाद्यांना अपील केलं आहे की, पत्नीला सुखरूप सोडा.
पत्नीची नाक्षवाद्यांकडे विनंती
अर्पिताने नक्षलवाद्यांकडे विनंती केली आहे की, त्यांनी एका बहिणीची विनंती मान्य करावी. माणूसकी दाखवावी. माझा पती एक चांगला माणूस आहे. जेव्हापासून त्यांचं अपहरण झाल्याचं समजलं तेव्हापासून आम्ही काहीच खाल्लं नाही. मला ३ वर्षाचा मुलगा आहे. त्यालाही त्याच्या वडिलांची आठवण येत आहे. त्यांना सोडून द्या. ही एका पत्नी आणि आईची विनंती आहे. दरम्यान, एक दिलासादायक बातमी म्हणजे चपराशी लक्ष्मण परतागिरी सुखरूप आपल्या घरी पोहोचला आहे. पण अजूनपर्यंत त्याने काहीच सांगितलं नाहीये. चपराश्याने सांगितलं की, त्या दोघांनाही वेगवेगळं ठेवण्यात आलं होतं. जंगलात जनता कोर्ट भरवलं होतं. त्यानंतर त्याला परत सोडलं. पण इंजिनिअर साहेबांना सोडलं नाही.
पत्नी आपल्या मुलाला सोबत घेऊन नक्षलवाद्यांना भेटायला निघाली
पोलीस इंजिनिअरचा शोध घेत आहेत. एसपी कमलोचन कश्यप म्हणाले की, सब इंजिनिअरचा शोध घेतला जात आहे. एक-दोन दिवसात नक्षलवादी त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सब इंजिनिअरची पत्नी अर्पिता मनकेली भागात आपल्या मुलाला सोबत घेऊन नक्षलवाद्यांना भेटायला निघाली आहे.