जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत लागू निर्बंधांबाबत जिल्हाधिकार्यांनी स्पष्टीकरणात्मक आदेश काढले आहेत. त्यानुसार कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांशी संपर्कात येणार्या प्रत्येकाला आरटीपीसीआर किंवा अँटिजेन टेस्ट करुन याबाबतचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य केले आहे. या अहवालाची वैधता १५ दिवस असेल.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अजिभीत राऊत यांनी आज (११ रोजी) जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत लागू निर्बंधांबाबत स्पष्टीकरणात्मक आदेश काढले आहेत.
असे आहेत नवीन निर्बंध
खासगी कार्यालयातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक यांच्याशी संबंधित कर्मचारी, फिल्म, सिरीयल, जाहिरातींशी संबंधित कर्मचारी, होम डिलिव्हरी सुविधा पुरविणारे कर्मचारी, विविध परीक्षेचे आयोजनशी संबंधित कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, खाद्यपदार्थ विक्रेते, औद्योगिक निर्मिती करणारे घटकात काम करणारे कामगार, कर्मचारी स्टाफ, संबंधित कर्मचारी, ई-कॉमर्समधील कर्मचारी, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, आरबीआय संलग्न कार्यालयातील कर्मचार्यांनी कोविड-१९ लसीकरण न केल्यास त्यांना अँटिजेन टेस्ट करुन चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे अनिवार्य राहील. मात्र चाचणी करताना कोविड सदृश लक्षणे असल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आदेशात म्हटले आहे.
यासोबतच आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, सीएससी सेंटर्स, पासपोर्ट सेवा केंद्र हे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत सुरू ठेवता येतील. सर्व वृत्तपत्रे (मासिके, जनरल नियतकालिके) हे दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत वितरित करता येतील. तथापि, संबंधित अस्थापनाशी निगडीत ४५ वर्षावरील सर्व कर्मचार्यांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच घरपोच अंक वाटप करणार्या कर्मचार्यांनी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
व्हेटर्नरी हॉस्पिटल, निमल केअर सेंटर, पेट शॉप हे दररोज सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत सुरू राहतील. तसेच अंडी, चिकन, मासे, मटण, जनावरांचा चारा इत्यादी विक्री करणारी दुकाने आणि या सर्व बाबीकरिता आवश्यक असलेला कच्चा माल पुरवठा करणारी दुकाने, गोदामे व वाहतूक व्यवस्था, पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक विधीसाठी, व्यायामासाठी घराबाहेर घेऊन जाण्यासाठी तसेच प्राणी कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या व जीवनावश्यक असलेल्या पशु अन्नपदार्थांची विक्री करणारी दुकाने दररोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवता येतील.
संबंधित अस्थापनाशी निगडीत सर्व कर्मचार्यांनी ४५ वर्षावरील लसीकरण करून घ्यावे तसेच घरपोच वाटप करणार्या कर्मचार्यांनी आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. याची वैधता १५ दिवस असेल. हे नियम १० एप्रिलपासून लागू राहतील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशाराही जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशाद्वारे दिला आहे.