मुंबई (वृत्तसंस्था) स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
एमएस धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीने जानेवारी २०१५ मध्ये भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. अखेर विराटने ७ वर्षांनंतर या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
विराटने कर्णधारपद सोडल्याची पोस्ट करताना म्हटले आहे की, ‘संघाचा योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी गेली ७ वर्षे कठोर परिश्रम, चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’
याशिवाय विराटने बीसीसीआय, संघसहकाऱ्यांसह, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचे आभार मानले आहेत. तसेच कर्णधारपदासाठी त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल एमएस धोनीचेही त्याने आभार मानले आहेत.