मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारतर्फे आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात जनहिताच्या कोणत्याही उपयुक्त योजनांचा समावेश नसून सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला केवळ पानेच पुसण्यात आली असल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. आ. गिरीश मह्जन म्हणाले की, कर्जमाफीच्या योजनेत ४५ टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही. शेतकर्यांना धान्यासाठी, विज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवीबाब आहे. महाराष्ट्रात ८० टक्के शेतकर्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच ५० हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळणार नाही. राज्यात अनेक प्रकल्प प्रलंबीत आहेत. आमच्या काळात आम्ही सगळ्या प्रकल्पांना सुप्रमा देऊनही महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पांसाठी ठोस अशी कुठलीही तरतूद केली नाही. पेट्रोल-डिझेलच्या संदर्भात केंद्राविरोधात राज्यात आंदोलने केली जातात. मग राज्य सरकारने तरी कुठे इंधन दरवाढीपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. इंधन दरवाढीपासून कुठलीही सवलत या सरकारने दिलेली नाही, त्यामुळे त्यांनी आता केंद्रावर टिका करण्याचे धाडस करू नये.
आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, भाजपच्या काळातील बहुतांश योजना यावेळेच्या अर्थसंकल्पात आहेत. ज्यावर आधीच तरतूद केली गेली आहे. यांनी नवीन असे काहीही केले नाही. आरोग्यावर मोठी तरतूद केल्याचे ते म्हणताय पण आधीच्या तरतूदींचे काय? त्या तरी पुर्ण झाल्या का? त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली आहे.