मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस चौकशी नको आधी फाशी द्या अशी मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे, असा टोला राऊतांनी लगावला.
परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत असं म्हटलं. “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका त्यांनी केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
“चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
“वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.