मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.
पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज (वय ८३) यांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. गायक अदनान सामीनंही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदनान सामीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीनं खूप दुःख झालं. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेनं अनेक पिढ्यांना प्रभावित केलं आहे.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केलं. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही त्यांनी संगीत दिलं होतं. बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती.