मुंबई (वृत्तसंस्था) कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारलं आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं आहे. देशभरात तीन तास हे आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या काळात शाळेच्या बस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. किसान मोर्चाने ही माहिती दिली आहे. चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लाल किल्ल्यावर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कृषी कायद्यास विरोध करणार्या शेतकरी संघटनांनी देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारला आहे. ३ कृषी कायद्याविरोधात काही शेतकरी संघटनांनी दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ हे आंदोलन सुरु आहे. दिल्लीत कायदा सुव्यस्था राखण्यासाठी आयटीबीपी, सीआरपीएफ आणि आरएएफच्या तुकड्या देखील तयारीत आहेत. इतकंच नाही तर एनएसजीला देखील गरज पडल्यास शॉर्ट नोटीसमध्ये जागेवर पोहोचण्यासाठी स्टॅंडबाय ठेवण्यात आलं आहे.
आजचे चक्काजाम आंदोलन कुणी पुकारले?
चक्काजाम आंदोलन करत असलेल्या ४० शेतकरी संघटनांद्वारे बनवण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चाने हे चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. शनिवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे. या दरम्यान गाड्यांना रोखले जाईल. सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जाम केले जातील.
















