जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रखडलेली खरीपपूर्व मशागतीची कामे सध्या असलेल्या उघडीपमुळे पुन्हा गतीने सुरू आहेत. गेल्या आठवड्याभरात बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे युद्धपातळीवर पूर्ण केली असून, पूर्वहंगामी कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. तर उर्वरित शेतकरी पेरणीसाठी आता मोसमी पावसाच्या सरींची वाट पाहत आहेत.
यंदा सोयाबीन, मका व कडधान्य लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून, या पिकांसाठी योग्य असा मोसमी पाऊस आवश्यक आहे. सध्या पेरणीची वेळ जवळ येत असून पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आशावादी आहेत. बियाणे खरेदी शेतक ऱ्यांकडून सुरू आहे. मका वगळता सर्वच बियाणे सध्या बाजारात उपलब्ध आहे. अनेक विक्रेत्यांकडे खते उपलब्ध असल्यामुळे खतांची खरेदी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
देशी वाण नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड
यंदाच्या खरीप हंगामात राज्यात ‘अंकुर’ कंपनीच्या स्वदेशी पाच हे देशी संकरीत वाण बियाण्याचा पुरवठा न झाल्यामुळे देशी कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. वर्षानुवर्षे या वाणावर भरवसा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे न मिळाल्यामुळे ऐनवेळी अनिच्छेने का होईना, बीटी कपाशीची लागवड करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
कपाशी लागवड घटणार कृषी विभागाने जिल्ह्यात
सुमारे ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होईल, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कल यंदा कपाशीपासून दूर जाऊन इतर नगदी व अन्नधान्य पिकांकडे वळताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत कपाशीला बाजारात अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. उत्पादन खर्च वाढत असतानाही विक्रीतून नफ्याचा फारसा लाभहोत नसल्याने यंदा बरेच शेतकरी सोयाबीन, मका, तूर यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळले आहेत.
मका पेरा वाढणार
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा एक लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर मकाचा पेरा होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षी मक्याला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे आणि उत्पादनात समाधानकारक नफा मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी मका हे पिक प्राधान्याने निवडले आहे. जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र १५ ते २० टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.