जळगाव (प्रतिनिधी) सय्यद वसीम रिजवी यांच्या वक्तव्यामुळे जगात भारत देशाची प्रतिमा डागळत आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरवण्याचे हे षड्यंत्र असल्याने सय्यद वसीम रिजवी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी फिर्याद जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख अब्दुल्ला यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार अर्ज दाखल केला आहे.
सैयद वसीम रिजवी, माजी अध्यक्ष, शिया वक्फ बोर्ड, उत्तर प्रदेश, लखनौ यांनी सर्वोच्च न्यायालयात पवित्र कुराणातील २६ श्लोक वगळण्यासाठी जनहित याचिका दाखल केली, सदर जनहित याचिका न्यायप्रविष्ट असल्याने त्याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ परंतु वसीम रिजवी हे न्यायालयीन सादर प्रकरणाची माहिती बाहेर इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया व प्रिंट मीडिया यांना प्रसारित करून प्रसिद्ध करून ते आमच्या इस्लाम धर्माची बदनामी करीत आहेत. तसेच दोन समाजात हिंदू व मुस्लिममध्ये तेढ निर्माण करून वेगवेगळ्या गटात खास करून शीया, सुनीं, बोहरा, देवबंदी, बरेलवी, अहेले हदीस व इतर गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करीत आहेत.
आज संपूर्ण जग हे कोविडशी लढत असताना एकत्रित आलेला आहे. त्यामुळे समाजामध्ये गोडवा निर्माण झालेला असताना रिजवी यांच्या वक्तव्याने समाजातील मधुरता नष्ट होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समाजात व गटात तणाव निर्माण होऊन अशांतता पसरविण्याचा प्रयत्न रिजवी करीत आहेत व त्यांच्या या प्रयत्नामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे भारत देशातच नव्हे तर जगभरातील मुस्लिमांच्या भावना त्यामुळे दुखावल्या आहेत.
सय्यद वसीम रिजवी यांच्या वक्तव्यामुळे जगात भारत देशाची प्रतिमा डागळत आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरवण्याचे हे षड्यंत्र असल्याने सय्यद वसीम रिजवी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ब,२९५, २९८ व ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशा आशयाची लेखी फिर्याद जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख अब्दुल्ला यांनी १५ मार्च २१, सोमवार रोजी संध्याकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना प्रत्यक्ष भेटून समक्ष लिहून दिलेली आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी सांगितले. सदर तक्रारीची प्रत जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव यांना सुद्धा दिलेली आहे
कोर्टात न्याय मागणार
जळगाव पोलिसांनी आठ दिवसात योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास सदर प्रकरणी जळगाव न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येईल व न्यायालयातून योग्य ते आदेश प्राप्त करण्यात येईल, असे मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.