मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेबद्दल बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने चांदीवाल समितीसमोर माहिती दिली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला हजर करण्यात आले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेबद्दल वाझेने माहिती दिली.
वाझेची आयोगासमोर झालेली प्रश्नोत्तरे
प्रश्न : रायगडमध्ये अर्णव गोस्वामीविरुद्ध दाखल गुन्हा आणि टीआरपी प्रकरण तपासासाठी तुमच्याकडे होते का?
उत्तर : टीआरपी प्रकरणी गुन्हे शाखेकडे होते आणि मी त्याचा तपास अधिकारी होतो. तर, अर्णव गोस्वामी प्रकरणात रायगड पोलिसांनी मदत मागितली होती. त्यामुळे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचा आदेशानुसार त्या पथकाचे नेतृत्व मी करत होतो.
प्रश्न : रायगडहून किती पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आले होते?
उत्तर : ते आठवत नाही पण आम्ही सकाळी ६ वाजता अर्णव गोस्वामींच्या घरी पोचलो होतो.
प्रश्न : पोलिसांनी केलेल्या कारवाईचे प्रसिद्धीपत्रक काढले जाते का?
उत्तर : हो
प्रश्न : गोस्वामींच्या अटकेनंतर वरिष्ठांना माहिती दिली होती का?
उत्तर : या संदर्भात मी वरिष्ठांना माहिती दिली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर आणि सहपोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचो.
प्रश्न : आयुक्त वगळता तुम्ही एसीपी, डीसीपी आणि सहपोलीस आयुक्तांना रिपोर्ट करायचा असं म्हणायचं का?
उत्तर : आयुक्तांना रिपोर्ट केलेले मला आठवत नाही.
प्रश्न : गोस्वामींच्या अटकेनंतर चुकीच्या पद्धतीने अटक केली याबाबत वाद झाला का?
उत्तर : आठवत नाही
प्रश्न : टीआरपी प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती दिली होती का?
उत्तर : मी माहिती दिली नव्हती.
प्रश्न : गोस्वामींच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली का?
उत्तर : मी गोस्वामींची चौकशी केली नाही पण त्यांच्या कर्मचाऱ्याची चौकशी केली.
प्रश्न : टीआरपी प्रकरणात तुमचे सहकारी कदम, जगताप, सांडभोर आणि तुम्हाला आयुक्तांकडून गौरवण्यात आले का?
उत्तर : हो. पण मला कदम कोण हे माहीत नाही.
प्रश्न : टीआरपी प्रकरणात बार्ककडून तुम्ही ३० लाख रुपये घेतले असा आरोप आहे?
उत्तर : आठवत नाही
प्रश्न : बार्ककडून ३० लाख घेतले ह्या आरोपाबद्दल ईडीकडून चौकशी झाली का?
उत्तर : नाही
प्रश्न : टीआरपी प्रकरणात आरोपी आणि पीडित कोण होते?
उत्तर : मला आठवत नाही
प्रश्न : बार्कने काही विशेष तक्रार केली होती का? त्यात गोस्वामींचे नाव होते का?
उत्तर : नाही
प्रश्न : टीआरपी प्रकरणात रेटिंगमध्ये छेडछाड केल्याबद्दल गोस्वामींच्या विरोधात तक्रार होती का?
उत्तर : आठवत नाही.