धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड या गावात शासनाने मुस्लिम बिरादरीला 20 आर जमीन स्मशानभूमीसाठी दिली असून त्यावर मुस्लिम समाजातील दफन विधी होत असतो. मागील काही दिवसापासून या स्मशानभूमी मधूनच अवैध स्वरूपाची वाळू वाहतूक होत असल्यामुळे कबरींची विटंबना होत होती. याबाबत तक्रार वजा निवेदन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात नांदेड येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले होते आहे. त्यावर आज धरणगाव तहसीलदारांनी दफनभूमीतून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याचे दिले आहेत.
१ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात धरणगाव तालुक्यातील मौजे नांदेड येथील मुस्लिम समाजाच्या ट्रस्टीनी निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, मौजे नांदेड ता. धरणगाव गट क्रमांक १६४१ मध्ये ग्रामपंचायतने मुस्लिम समुदायाला कब्रस्तानसाठी २० आर जमीन दिली होती. त्या जागेवर १९८९ पासून मुस्लिम समाज दफनविधी व ईदची नमाज अदा करीत आहेत. मागील काही दिवसापासून दफनभूमीतून अवैध वाळू वाहतूकीद्वारे कबरींची विटंबना होत असल्याचा संतापजनक प्रकारामुळे धार्मिक द्वेष पसरवीत असल्याची तक्रारीत म्हटले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांनी धरणगाव तहसीलदार यांना चौकशीचे आदेश दिले होते.
तहसीलदार धरणगाव यांनी सदर प्रकरणी पत्र क्र जमीन – १४१ ने तातडीने २ एप्रिल रोजी मुख्य तक्रारदार फारुक शेख यांच्यासह नांदेड येथील अकरा ट्रस्टी, उपअधीक्षक भूमी अभिलेख धरणगाव, सरपंच / ग्रामसेवक ग्रामपंचायत नांदेड व धरणगावचे पोलीस निरीक्षक यांच्यासह समक्ष बैठक घेतली. यावेळी फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी यांचे १३ फेब्रुवारी ८९ चे आदेश, नोंद क्रमांक ५५९९ व सुनावणी वाळू वाहतूकदार कशाप्रकारे विटंबना करीत असल्याचे छायाचित्र व चित्रफीत दाखवून आपले म्हणणे कागदोपत्री सिद्ध केले. त्यावरून तहसीलदार धरणगाव महेंद्र सूर्यवंशी, पोलीस इन्स्पेक्टर उद्धव ढमाले व भूमी अभिलेख उपाध्यक्ष विजयकुमार देवरे यांनी वाळू वाहतूकदार प्रतिनिधी दीपक महाले व तुषार चौधरी यांना त्वरित दफनभूमीतून वाहतुक बंद करण्याचे आदेश दिले. तसेच पर्यायी रस्ता शोधल्यानंतर वाळू वाहतूक करण्यात यावी, असे सांगितले. तर सदर बैठकीचे ‘मिनट्स ऑफ मीटिंग’ घेण्यात आले. मौजे नांदेडतर्फे ग्रामसेवकसह ट्रस्टी अजीम मनीयार, शामाद मणियार, अनिस पटेल,शेख फक्रुद्दीन, अमीन मणियार, नोमान शाह, सलमान मणियार कलीम खाटीक , अहमद शामाद व शकील मणियार उपस्थित होते.
मुस्लिम समुदायाने मानले आभार
जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाने त्वरित निवेदनावर कारवाई केल्याने फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक धरणगाव उद्धव ढमाले यांचे आभार मानले.
आजच्या बैठकीत वाळू वाहतूक ठेकेदाराच्या आलेल्या प्रतिनिधींना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार होत नाही तोपर्यंत वाळू घाट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनाही अधिक चौकशीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
– महेंद्र सूर्यवंशी (तहसीलदार धरणगाव)