रत्नागिरी (वृत्तसंस्था) रत्नागिरीतील जयगड येथील मासेमारी करणारी ‘नावेद २’ ही बोट बेपत्ता झाली आहे. नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही बोट असून २६ ऑक्टोबरपासूनच ही बोट बेपत्ता आहे. बेपत्ता बोटीत एकूण ६ जण असून बोटीचे मालक संसारे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
नविद-२ ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून २६ ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी यांच्याकडून युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ हाती घेण्यात आले आहे. या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल असे खलाशी आहे. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत.