नंदुरबार (प्रतिनिधी) माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते.
माणिकराव गावित यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी उपचारांसाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी म्हणजेच उद्या सकाळी त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवापूर तालुक्यातील धुळीपाडा इथल्या एका गरीब आदिवासी सामान्य कुटुंबात माणिकराव गावित यांचा जन्म झाला होता. 1965 साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. तिथूनच त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जंगल कामगार सोसायट्यांमध्ये काम करणारा काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जाऊ लागले. दरम्यान, माणिकराव गावित हे 1981 साली प्रथमच खासदार झाले, त्यावेळी त्यांचे 47 वय होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल 9 वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. 1999 साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना 1.30771 इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या टॉपटेन खासदारांमधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झाले.