जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील वाघ नगरातील संभाजी चौक परिसरात बंद असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून सोने चांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना दि. १० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्रीमध्ये तीन घरे चोरट्यांनी फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील वाघ नगरातील राजे संभाजी चौकात शिवदास हंसराज नाईक (वय ५७) हे वास्तव्यास असून ते आदिवासी प्रकल्प कार्यालयात उपलेखापाल म्हणून नोकरीस आहे. भाडेतत्वार राहत असलेल्या घराशेजारी शिवदास नाईक यांचे घर असून ते त्याठिकाणी सामान शिफ्ट करीत आहे. दि. १० मे रोजी ११ वाजेच्या सुमारास नाईक हे ते राहत असलेल्या घराला कुलूप लावून स्वतःच्या घरात झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ते भाडेतत्वावर राहत असलेल्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात शिरले. त्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी सोन्याचे पदक, अंगठी, चांदीची पायल असा ऐवज चोरुन नेला. दि. ११ मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नाईक यांना जाग आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
गावाहून परतल्यानंतर घटना उघडकीस
शिवदास नाईक यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता, त्यांना काही अंतरावर राहणाऱ्या भूषण साहेबराव पाटील हे बाहेरगावी गेलेले असतांना त्यांच्या घरात देखील चोरी झाल्याचे समजले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी चांदीच्या साडेचार भाराच्या तीन मुर्ती आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला. भूषण पाटील हे घरी परतल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याची खात्री झाली.
एका घरातून चोरटे रिकाम्या हाती परतले
चोरट्यांनी भूषण पाटील यांच्या घरात चोरी केल्यानंतर त्यांच्या शेजारील बंद असलेल्या जावेद सकावत तडवी यांच्या घरात देखील डल्ला मारला. गावाहून आल्यानंतर तडवी यांनी घरात पाहणी केल्यानंतर चोरट्यांनी तेथून काहीही चोरुन नेले नसल्याचे तडवी यांनी सांगितले.
चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज
चोरट्यांनी शिवदास नाईक यांच्या घरातून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १० भार वजनाच्या पायल, ४ हजार रुपये रोख तर भूषण पाटील यांच्या घरातून साडेचार भार वजनाच्या तीन मुर्ती आणि २ हजार रुपये रोख असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
नियोजित गस्त नसल्याने चोरट्यांनी बंद घरे केली टार्गेट
एकाच रात्री तीन बंद असलेल्या घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस ठाण्यापासून हा परिसर अत्यंत दूर असल्यामुळे रात्रीची गस्त याठिकाणी नियमीत होत नाही, त्यामुळे चोरटे या परिसरातील घरांना लक्ष्य करीत आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
















