धरणगाव (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण राज्यभर कोविड-१९ विषाणूची सावट असल्याकारणाने महाराष्ट्र शासनाने विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने गर्दीच्या कार्यक्रमांना निर्बंध घातलेले आहेत. त्या अनुषंगाने धरणगाव शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामागील मुख्य उद्देश कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविणे हाच आहे.
सध्या गणेशोत्सव सर्वत्र साजरा होत असून गणेश मूर्तींचे विसर्जन मिरवणुकीला देखील परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच धरणगाव नगरपालिकेतर्फे धरणगाव शहरातील सिद्धी हनुमान मंदिर, महात्मा गांधी उद्यान जवळील द्वारकादास विहीर, वाणी मंगल कार्यालय धरणगाव या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.
सर्व मंडळांनी आपापल्या मंडळांचे व घरगुती गणपतींचे विसर्जन मिरवणूक न काढता मूर्ती संकलन केंद्र या ठिकाणी मूर्ती संकलित करावयाच्या आहेत. नगरपालिकेतर्फे सर्व मुर्त्यांचे एकत्रित संकलन करून विधिवत पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. तरी सर्व गणेश मंडळांनी व घरगुती गणपती बसवणाऱ्या भाविकांनी आपापल्या मुर्त्या मूर्ती संकलन केंद्र येथे जमा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन धरणगाव शहरातील सर्व गणेश भक्तांना धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.