नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता सणासुदीचा हंगाम सुरू होणार असल्याने भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ७८ विशेष रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवरात्र सुरू होण्यापूर्वी रेल्वे वेगवेगळ्या झोनमध्ये सोयीस्कररीत्या ३९ जोड्यांनी रेल्वे चालवणार आहे. या रेल्वगाड्यांमध्ये बहुधा एसी स्पेशल, राजधानी, शताब्दी आणि दुरांतोचा समावेश राहणार आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खासगी भाडेतत्त्वावरील प्रमुख रेल्वे तेजस सुरू होणार आहे. त्यापैकी पहिल्यांदा तेजस दिल्ली ते लखनौदरम्यान धावेल, दुसऱ्या फेरीत अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावतील. तेजस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची करोना तपासणी होणार असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सेतू ऍप मोबाइलमध्ये असल्याशिवाय प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या सर्व ट्रेन विशेष रेल्वे म्हणून चालवल्या जातील, असे रेल्वे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे मंडळाने इतर विशेष ७८ गाड्या चालविण्यास परवानगी दिली आहे. ज्या गाड्यांची प्रवाशांकडून जास्त मागणी आहे, अशा मार्गांवरील या गाड्या निवडल्या जाणार आहेत.
झोन स्तरावर रेल्वे सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण तेजस एक्स्प्रेस १७ ऑक्टोबरला नवरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. करोनाच्या संकटात उत्तराखंड आणि महाराष्ट्रात विविध निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे या राज्यांसाठी रेल्वेगाड्यांची संख्या फारच मर्यादित होती. या विशेष रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीत हरिद्वार ते डेहराडून ते मुंबईदरम्यान गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.