मुंबई (वृत्तसंस्था) यंदा गणेशोत्सव व दहीहंडी व मोहर्रम उत्सव विना निर्बंध साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटवण्यात आली आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वृत्त पत्रकार परिषद घेत दिलं. विशेष म्हणजे गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दहीहंडी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळले गेले पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनामुळं अनेक निर्बंध होते पण यंदा सर्व मंडळांची इच्छा लक्षात घेऊन दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम हे राज्यातील उत्सव साजरे झाले पाहिजे, अशी बैठकीत चर्चा झाली. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना पोलीस, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, कोविड काळात सण-उत्सवाला मर्यादा होत्या; पण यंदा मंडळांचा उत्साह आहे. हे लक्षात घेता गणेशोत्सव, दहिहंडी, मोहर्रम हे सण धडाक्यात साजरे व्हावेत याबाबत बैठकीत चर्चा झाली. यात कायदा सुव्यवस्था राखून शांततेत उत्सव व्हावे म्हणून सर्व प्रशासन, जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, व्यवस्थित आणि सुरळीत उत्सव पार पडावे यासाठी विसर्जन मार्गातील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. मंडप आणि अन्य परवानगी सुरळीत मिळावी यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करत आहोत. अटी-शर्थी लावू नये, असे निर्देश दिले आहेत.
मंडपाच्या परवानग्या सुटसुटीत करण्यात आल्या आहेत. एक खिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धत करण्यात आलेली आहे, जेणेकरुन गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही. तसेच मंडळांना नोंदणी शुल्क भरावे लागू नयेत, हमीपत्रही घेऊ नका असं पोलिसांना सांगितलं आहे. गणेश मूर्ती उंचीवरील मर्यादा काढून टाकली आहे तसेच विसर्जन घाटांवर दिव्यांची व्यवस्था आणि मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध व्हाव्यात, ही मूर्तीकारांची मागणी देखील मान्य केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.