मुंबई (वृत्तसंस्था) यंदा तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर हव्याहव्याशा वाटणाऱ्या गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता आहे. येत्या 6 जून रोजी मुंबई मान्सूनच्या पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या चार दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra Weather) विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात तापमान कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. तसंच विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सूनचं अंदमानात आगमन 48 तासांपूर्वीच झालंय. त्यानंतर आता मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं जातंय. मान्सूनचा पुढचा प्रवास असाच सुरु राहिला, तर मुंबईतही मान्सूनचा प्रवेश 6 जून रोजी होईल, अशा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
9 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील 9 जिल्हयांचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या चार ते पाच दिवसात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुढचे दोन दिवस केरळ किनारपट्टीच मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा सांगली, तसंच परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.