मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे कोश्यारी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ ट्विट केला असून राज्यपालांच्या या कृतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नाहीय. कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडलेत. त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलेय. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यताय. राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 26/11 मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पादत्राणे काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन केले. पुष्पचक्र अर्पण केले. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडलेत. काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ ट्विट केला असून राज्यपालांच्या या कृतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे.