नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जातपडताळणीबाबत नवीन राणा-कौर यांनी मोठा दणका दिला होता. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी केला होता. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केले होते. या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने राणांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन राणा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली आणि सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर खासदार नवनीत कौर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल अन्यायकारक आहे. मी दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी नवनीत कौर राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती.
काय आहे प्रकरण?
नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल ८ जून रोजी घोषीत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने ही घटना घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना २ लाखाचा दंड ठोठावला होता. तसंच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र ६ आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले होते. जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला होता, त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. पण, अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.