जळगाव (प्रतिनिधी) राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, मनपात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत राजकारण्यांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. रविवारी शिवसंपर्क अभियानच्या निमित्ताने अजिंठा विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संपूर्ण हॉल गर्दीने खच्चून भरला होता. एवढेच नाही तर यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन झाले नसल्याचे पहावयास मिळाले.
सर्वसामान्य कष्टकरी जनतेला व व्यापाऱ्यांना रोज चारच्या आत घरात जावे लागत आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनाच या सगळ्या नियमांना केराची टोपली दाखवत आढावा बैठक घेत असल्याचे चित्र काल अजिंठा शासकीय विश्रामगृहात दिसून आले. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील स्वतः या बैठकीला उपस्थित होते. इतकंच नव्हे तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, विष्णू भंगाळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी देखील बैठकीला होते.
















