मोरबी (वृत्तसंस्था) गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.
मृतांच्या संख्येत होऊ शकते वाढ
मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी शक्यता घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हा पूल ७ महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद होता. तो ५ दिवसांपूर्वीच खुला करण्यात आला होता. गुजराती नववर्षाच्या सुट्या आणि रविवार असल्याने मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी येथे आले होते. ही दुर्घटना सायंकाळी ६.३० ते ६.४५ दरम्यान झाली. तेव्हा पुलावर सुमारे ५०० लोक होते. क्षमतेपेक्षा जास्त लोक जमा झाल्याने पुलाचा आधार तुटला आणि सुमारे ३०० लोक ६० फूट खाली नदीत पडले. नदीत पडलेल्या महिला आणि मुले पुलाची जाळी पकडून मदतीसाठी आरडाओरड करत असल्याचे या घटनेच्या व्हिडिओत दिसत आहे. पुलाची जाळी-केबल धरून बसलेल्या सुमारे २०० लोकांना वाचवण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय.
मोरबी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मोठा दावा
मोरबी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संदीप सिंह झाला यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाची परवानगी न घेता हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. नगरपालिकेकडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आलं नव्हतं, असा खुलासा आता या प्रकरणी होत आहे. तसंच. ओरेवा कंपनीने पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्याआधी कोणत्याही प्रकारची गुणवत्ता तपासणी केली नव्हती. गेल्या सात महिन्यांपासून या पुलाचे नुतनीकरण सुरू होते. तर, २६ ऑक्टोबर रोजी सर्वसामान्यांसाठी हा पूल खुला करण्यात आला होता. ओरेवा कंपनीनेच या पुलाचे नुतनीकरण हाती घेतले होते. रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर ४०० ते ५०० जण उपस्थित होते.या पुलाची क्षमता शंभर जणांची होती. पुलावर गर्दी वाढल्याने पूल तेवढा भार सहन करु शकला नाही आणि त्यामुळंच तो तुटला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
लष्कर, हवाई दलासह नौदलाकडून बचावकार्य
नदीवरील पूल कोसळताच तत्काळ तिन्ही सैन्य दलांचे बचावपथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवळपास २०० जवानांकडून हे बचावकार्य राबवलं जात आहे, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. अग्निशमन दलाची सात पथकं, राज्य मदत दलाच्या तीन पथकांसह एनडीआरएफच्या दोन पथकांकडूनही पीडितांचा शोध घेण्यात येत आहे.