मुंबई (वृत्तसंस्था) ‘रावसाहेब दानवे हे दानव असून मला निवडणुकीत त्यांनी त्रास दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत डोक्यावरील टोपी काढणार नाही’, असा संकल्प शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवला.
राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी आता थेट भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच ललकारले आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी गर्जनाच अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील राजकारण अधिकच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना रावसाहेब दानवे यांनाही ललकारले. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणा नाही, असं सत्तार म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचाही समाचार घेतला. राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
‘आता ज्यांच्या विरोधात टोपी घातली. त्यांच्या प्रचाराच काम करावे लागले. त्यावेळी दिल्लीतील मोठ्या नेत्याने आम्हाला बोलावून घेतले होते आणि त्यांनी दानवे यांच्या प्रचाराबद्दल सांगितले. पण, मी त्यांना सांगितले, हा माणूस जो आहे तो चकवा आहे, तो काय आमच्या मागे लागला तर पाठलाग काही सोडणार नाही. आज यांना निवडून दिले तर उद्या ते आमच्यामागे कोयता घेऊन मागे लागतील, ते दानवे नाही दानव आहे. मी त्यांना माझ्या मतदारसंघात १ लाखांची लीड दिली. पण, शेवटी जे करायचे तेच दानवेंनी केलं. अर्जुन खोतकर यांच्या मागे लागून बळी घेतला, असा किस्साही सत्तार यांनी सांगितला.