नाशिक (वृत्तसंस्था) त्र्यंबकेश्वरजवळील तळेगाव येथे भातपिकाला पाणी भरण्यासाठी नदीतील जलपरी ढकलत असताना शॉक लागल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. तुकाराम गंगाराम पारधी (वय २५) व ज्ञानेश्वर गंगाराम पारधी (वय १८) अशी दोघांची नावे आहेत.
बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास भात पिकाला पाणी भरण्यासाठी तुकाराम त्याचा लहानभाऊ हे दोघे जण किकवी नदीवरील आपली मोटर सुरु करण्यासाठी गेले. यावेळी नदीची पातळी थोडी कमी झाल्यामुळे मोकळी दिसत असलेली जलपरी पुढे पाण्यात ढकलण्याच्या प्रयत्नात तुकारामला विजेचा शॉक बसला. तो पाण्यात पडला म्हणून त्याला वाचविण्यासाठी ज्ञानेश्वर पाण्यात उतरला पण त्यालाही शॉक लागला. खोल पाण्यात पडल्यामुळे दोघेही मरण पावले. या दोघांनाही त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉ. राहुल येवले यांनी तपासून मृत घोषित केले.