जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील ३८ गावांना अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे. या गावांमध्ये ६७५ घरांची पडझड झाली आहे. तर ६६१ लहान-मोठ्या जनावरांची हानी झाली आहे. ३०० दुकानांमध्ये पाणी घुसून मालाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका चाळीसगाव तालुक्याला बसला.
कन्नड घाटासह पाटणादेवी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर, डोंगरी आणि गिरणा नदीला मंगळवारी पहाटे पूर आला. या पुरामुळे चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा. ही गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. या सर्व गावांमधील शेकडो गुरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे ५० ते ६० घरांमध्ये पाणी शिरले आहे. चाळीसगाव शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील लोकांची तात्पुरती व्यवस्था एबी हायस्कूल व उर्दू हायस्कूलमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था चाळीसगाव नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. दरम्यान, पुरामुळे एकट्या चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या तालुक्यातील ३२ गावे बाधित असून, त्याठिकाणी १५५ लहान तर ५०६ मोठ्या पशूंची हानी झाली आहे. एका ६० वर्षीय वृद्धेचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे, ६१७ घरांची अंशतः तर २० घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. ३०० दुकानांचेही नुकसान झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यासह भडगाव तालुक्यातील २ तर पाचोरा तालुक्यातील ४ गावे पुरामुळे बाधित आहेत. भडगावात १४ घरांची पडझड झाली आहे. पाचोरा तालुक्यातही २४ घरांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १५ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, महसूल प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल तातडीने राज्य सरकारला पाठवला आहे. काल (मंगळवारी) रात्री अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी हा अहवाल आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन मंत्रालयाला सादर केला आहे.