हाथरस (वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशमधील शाळेच्या प्रगतीसाठी विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक नाना तहेचे प्रयत्न करत असतात. शाळा नावारुपाला यावी, यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील शाळेच्या संचालकाने संस्थेच्या आणि आपल्या कुटुंबाच्या समृद्ध प्रगतीसाठी दुसरीत शिकणाऱ्या कोवळ्या निष्पाप विद्यार्थ्यांचा ‘नरबळी’ दिला. या मुख्याध्यापकाचे वडील तंत्रविद्येतील माहीतगार असून, त्यांच्या सांगण्यावरूनच विद्यार्थ्यांचा गळा आवळून खून करण्यात आला. पोलिसांनी शाळेचा मालक, संचालक, मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना अटक केली आहे.
चुरसेन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे श्रीकृष्ण कुशवाहा यांचा ११ वर्षांचा मुलगा कृतार्थ हा सहपऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रसगंवा गावातील डीएल शाळेत शिकत होता. कृतार्थला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आई-वडिलांनी त्याला शाळेच्या वसतिगृहात ठेवले होते. सोमवारी सकाळी श्रीकृष्ण कुशवाहा यांना शाळा आणि वसतिगृहाचे संचालक दिनेश बघेल यांनी फोन करून ‘कृतार्थची प्रकृती ठीक नाही’, अशी माहिती दिली. श्रीकृष्ण कुशवाहा आपल्या पत्नीसह तातडीने रसगंवा येथे आले. त्यांनी दिनेश बघेल यांची भेट घेतली. त्यांनी मुलाची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बघेल याने कृतार्थला डॉक्टरकडे नेल्याचे सांगितले.
श्रीकृष्ण कुशवाहा कुटुंबीयांसह सादाबाद येथील दवाखान्याच्या दिशेने निघाले. त्या वेळी त्यांना अर्ध्या वाटेत दिनेश बघेल हा गाडीने दवाखान्याच्या दिशेने जाताना दिसला. त्याच्या कारच्या मागच्या आसनावर कृतार्थ निजलेला दिसला. त्यांनी बघेलची गाडी अडवली. कृतार्थला त्यांनी दवाखान्यात नेले. तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी शवविच्छेदनाची मागणी केली. त्यांनी सादाबाद पोलिसांत तक्रार दाखल केली. सादाबादचे पोलीस प्रमुख हिमांशू माथुर यांनी संचालक दिनेश बघेल, त्याचे वडील आणि शाळेचे मालक जसोधन यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्यात दोन शिक्षकांचा समावेश आहे.
बळी देण्याच्या उद्देशाने कृतार्थची हत्या झाल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शाळेचा मालक जसोधन सिंह, संचालक दिनेश बघेल, मुख्याध्यापक लक्ष्मण सिंह आणि दोन शिक्षक रामप्रकाश सोलंकी व वीरपाल सिंह अशा पाच जणांना अटक करण्यात आले आहे. विद्यादानाचे पवित्र कार्य करण्याच्या जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळेसारख्या पवित्र वास्तूच्या परिसरात असे निदंनीय कृत्य केल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नरबळी दिल्याने शाळा भरभराटीला येईल !
शाळेच्या संचालकावर मोठे कर्ज होते. नरबळी दिल्याने शाळा भरभराटीला येईल आणि आपल्यावरील सर्व संकटे दूर होतील. शिवाय घराचीही काळजी चिंता मिटेल, अशी शाळेच्या मालकाची म्हणजेच संचालक दिनेश बघेल याचे वडील जसोधन सिंह यांची अंधश्रद्धा होती. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनेश बघेल यांच्या डीएल शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनेक भारलेल्या वस्तू बांधल्याचे दिसून आले. तिथे अनेक विचित्र वस्तूही दिसून आल्या. यामागे जसोधन असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रवेशद्वारावर नुकतीच एक कापडाची बाहुली उलटी बांधण्यात आली होती.
झोपेतच केले अपहरण !
रविवारी रात्री दिनेश बघेलने शाळेचा मुख्याध्यापक लक्ष्मण सिंह तसेच रामप्रकाश सोळंकी आणि वीरपाल सिंह या दोन शिक्षकांना हाताशी धरत शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या दुसऱ्या इयत्तेतील ११ वर्षीय कृतार्थचे झोपेतच अपहरण केले. शाळेच्या आवारातील कूपनलिकेजवळ कृतार्थचा बळी देण्यात येणार होता. मात्र, कृतार्थला तेथे घेऊन जात असताना तो झोपेतून जागा झाला आणि रडू लागला. त्यामुळे आरोपींनी घाबरुन त्याची गळा आवळून हत्या केली.
पूर्वीही केला होता प्रयत्न !
आरोपींनी यापूर्वीही नरबळी देण्याचा अघोरी प्रयत्न केला होता. या सर्वांनी मिळून ६ सप्टेंबरला राज नावाच्या ९ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा कट आखला होता. राजचा गळा आवळताना त्याने आरडाओरड केली. त्या वेळी वैद्यकीय तपासणीत राजचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले होते. मात्र, त्या वेळी कोणावरही कारवाई का झाली नाही?, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.