मुंबई (वृत्तसंस्था) बंगालचा उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे गुलाब चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. दक्षिण उडीशा – उत्तर आंध्र प्रदेश दरम्यानच्या कलिंगपट्टणमजवळ किनारपट्टीला हे चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात २७ आणि २८ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये गोपालपूर किनारपट्टीवर साचलेलं ढग दिसत असून वेगवान वाऱ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. अजून किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकलं नसताना देखील गोपालपूरमध्ये हवामानात तीव्र बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील काही तासात दोन्ही राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने सोमवारी पुण्यासह नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांना सोमवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
मंगळवारी, रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २९ सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.